पुणे : ‘पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच झाडे लावून ती जगवली पाहिजेत. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे. सायकलचा वापर करावा. प्लास्टिकला हद्दपार करायला हवे,’ असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. परिसर हिरवागार आणि प्रदूषणमुक्त करण्याचा निश्चय शिक्षक-शिक्षतेकर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केला. पाणी, पेट्रोल, वीज अशा नैसर्गिक वस्तूंचा दुरुपयोग करणार नाही, पर्यावरण पूरक जीवनशैली आत्मसात करून सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.
प्रा. डॉ. चोरडिया म्हणाले, ‘वाढते दूषित वातावरण आणि पर्यावरणविषयक समस्या लक्षात घेत ‘सूर्यदत्ता ग्रुप’मार्फत विद्यार्थ्यांमध्ये सतत जागरूकता निर्माण केली जाते. त्यासाठी ‘वनराई’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन धारिया, पद्मविभूषण डॉ. सुंदरलालजी बहुगुणा, पद्मभूषण अण्णा हजारे, मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आदींनी मार्गदर्शन केले आहे. झाडे लावणे, सायकल रॅली, रामनदी स्वच्छता मोहीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर हीटिंग सिस्टीम, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशा विविध उपक्रमांत सूर्यदत्ता परिवार हिरीरीने सहभागी होतो.’